29 मई 2006

पूरिया-धनाश्री

संध्याकाळचं तरल वातावरण असतं. सगळं सावळं झालेलं असतं. कसलीशी गूढ माया दाटून आलेली असते. सगळीकडे एक भारावलेपण असतं. अशा वेळी पूरिया-धनाश्री चे मधाळ सूर कुठूनतरी येतात. त्या हरवत चाललेल्या चैतन्यमयी प्रकाशाचा विरह अधोरेखित करतात. कातरवेळेला वाटणारी अनाम व्याकुळता चोहीकडे पसरते. तिचे पंख हळूहळू विकलतेचे पांघरूण घालू लागतात. छाया गडद होऊ लागतात. सूर्यबिंब केशरी होऊन जातं. झाडाझाडांवर पाखरांच्या किलबिलाटाला उधाण आलेलं असतं. अशा वेळी ते पूरिया-धनाश्रीचे सूर एक निराळीच ओढ लावतात. सुरांचा एक चकवा तयार होऊन जातो. त्या भोवऱ्यात गरगरत नाही पण सगळं काही विसरायला लावणारी एक छानशी गुंगी यायला लागलेली असते. काहीतरी खूप आवडणारं असं हरपत असतं. हरवत असतं हातातून कायमचं निसटत असतं. ते पकडायला जायचंय याची पाय जाणीव करून देतात. हात ते घट्टा धरू पाहतात. पण एखाद्या झोपाळलेल्या लहान बाळासारखा मेंदू त्या गुंगीच्या आधीन झालेला असतो. ते काहीतरी हातातून सोडवत तर नसतं पण आपल्यावर आपला ताबा पण उरलेला नसतो. ते सूर दूर कुठेतरी घेऊन जात असतात. दूरच्या रानात खर्जातली माधुरी घुमत असते. तिथेच ते शाम वातावरण शाममयी झालेलं असतं. ती शामवेळ मूर्त होऊन तिथे उभी ठाकलेली असते. ती फुंकर घालते. रंजवते. ते हरवण्याचं दुःख शांत क्ररते. हृदयातला तो वणवा विझतो. हळूहळू थंडावा येतो. श्रांत पण भारावलेलं मन त्या लहरींवर डोलत असतं. ही संध्याकाळ संपूच नये असं वाटत असतानाच एक एक दिवा उजळत जातो. रात्रीची ती उदार माया आपलं शांत रूप घेऊन सामोरी येते. तिच्या आईच्या मायेच्या कुशीत जीव विरून जातो. उद्या पुन्हा तेच दुःख भोगण्यासाठी तयार होत राहतो... आणि पूरिया धनाश्रीचे ते वेडे सूर मात्र त्या रानात तसेच कोंदून राहिलेले असतात.
--अदिती

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें