22 दिसंबर 2006

आंतरजातीय विवाह!

(एका ई-पत्रातून माझ्यापर्यंत आलेली ही कथा. मनोरंजक वाटली म्हणून इथे टंकलिखित करते आहे. मी केलेला तिचा हा स्वैर अनुवाद आहे.)"
.... विवेकदादाच्या लग्नाचा प्रश्न आता ऐरणीवर आला होता. विक्रम और वेताळ मधल्या विक्रमराजासारखे बाबा अथकपणे त्याची पत्रिका घेऊन ज्योतिष्याकडे जायचे. सुंदर, दादाला साजेशा, मुख्य म्हणजे त्याची पत्रिका ज्यांच्याशी जुळायची अशा अय्यर मुलींची यादी घेऊन यायचे. नंतर ती यादी दादाला पाठवून द्यायचे. पण त्याचा आपला कायम नकार असायचा. दादाची म्हणजे सगळी मजामजाच होती. एक पाऊल अमेरिकेत आणि दुसरं कोचीनला ऑफिसात असणाऱ्या दादाला तिसरं पाऊल घरी टाकायला अधूनमधून वेळ मिळायचा हीच आपली गेल्या जन्मीची पुण्याई आहे असं आईचं मत होतं.
तसं आमचं घराणं कर्मठ. बाबा अजूनही रोज कपाळावर गंधाचं त्रिपुंड्र लावायचे. आई सगळे उपास तापास व्रतवैकल्यं न चुकता करायची. आजीचा तर जप दिवसरात्र सुरूच असायचा. त्या दिवशी, कोचीनहून विवेकदादाचा फोन खणखणला तेंव्हा आमच्या घरात तीच सोवळी शांतता नांदत होती. त्या फोनने त्या शांततेला भगदाड पाडलं. दादाने फोन करून बाबांना सांगितलं की त्याची बार्बरा नावाची एक अमेरिकन मैत्रीण काही कामानिमित्त दोन आठवडे त्रिवेंद्रमला येणार होती. तिची राहण्या-जेवण्याची व्यवस्था आमच्या घरी करायचं त्याने तिला कबूल केलं होतं.
दादाचा फोन आल्यापासून साधारण तिसऱ्या दिवशी काहीशा नाखुशीनेच बाबा आणि त्यांच्या मागोमाग मी असे विमानतळावर गेलो. सकाळचे आठ वाजले होते.बाबा, समोरून येणाऱ्या सर्व गोऱ्या मुलींकडे बघायचं टाळत, हातात 'वेलकम बार्बरा' असा फलक घेऊन उभे होते. अखेरीस एक उंच आणि धिप्पाड मुलगी आमच्या दिशेने आली. आळसावलेल्या चेहऱ्याने, इवलीशी ट्रॅव्हल बॅग ओढत ती आमच्याकडे आली तेंव्हा बाबांच्या चेहऱ्यावर उमटलेले भाव बघून मला फुटणारं हसू दाबायला मला जाम प्रयास पडले. तिचा वेष तर सगळ्यात नमुनेदार होता. गुडघ्याच्या वर येणारी अर्धी पँट, बिनबाह्यांचा टी शर्ट आणि उंच टाचांचे टॉक टॉक वाजणारे बूट. तिच्या टी शर्टचा गळा इतका खोल होता की तो बघून आईला आणि आजीला नक्कीच झीट येणार या विचाराने मला परत एकदा हसू आवरेना. माझा हात हातात घेऊन ती "हाय वायजयन्ती" असं म्हणाली. मीही तिच्याकडे बघून हॅलो केलं. ती बाबांकडे वळणार इतक्यात कसल्यातरी घाईत असल्यासारखे तिच्या नावाचा तो फलक उचलीत ते पार्किंगच्या दिशेनं चालूही लागले. दोन लहान भारतीय-अमेरिकन मुलं माझा हात धरून अमेरिकन ऍक्सेन्टमधे मला आन्ट वायजयन्ती ,अशी हाक मारताहेत असं चित्र माझ्या मनःचक्षूंपुढे दिसू लागलं. गाडीतही तिच्याकडे बघायचं टाळत बाबांनी जोरात गाडी हाकली. एरवी वाहतुकीचे सगळे नियम पाळणाऱ्या बाबांनी आज किती सिग्नल तोडले हे त्यांच्या लक्षात आलं नाही हेच बरं झालं.आम्ही घरी पोचलो. आई-आजी अंघोळी उरकून शुचिर्भूतपणे सकाळाची स्तोत्रं म्हणत होत्या. बार्बराने एकदम आत जाऊन आईला मिठी मारली. सोवळ्याचं असं पिठलं झालेलं बघून आईचा चेहरा बघण्यासारखा झाला. आईने भराभरा बार्बराला तिच्या खोलीत नेऊन सोडलं आणि तू फ्रेश हो तोवर जेवायची तयारी करते असं म्हणत तिथून काढता पाय घेतला. आजी सवयीने फक्त माळेतले मणी फिरवत होती. जपाचे मंत्र म्हणायचं भानही तिला राहिलं नव्हतं. आणि मी मात्र एकीकडे स्वतःशी हसत, ही सगळी गंमत याहूवर दादाला मिनिट बाय मिनिट रिअल टाईम अपडेट म्हणून सांगत होते.
बार्बरा जेवायला टेबलावर येऊन बसली तेंव्हा तिने कपडे बदलले होते. आत्ताचा तिचा टॉप तर इतका तोकडा होता की बास... "इट्स टू हॉट..." असं म्हणत तिने पानात काय वाढलंय हे बघायला सुरुवात केली. एक तर ती बाबांच्या समोरच बसली होती. त्यातून "आय थॉट वी वुड हॅव इंडियन चिकन " हे तिचं हे वाक्य ऐकून बाबांनी आपली मान जोरजोरात हालवली आणि आढ्याकडे बघायला सुरुवात केली. ही पारा तापमापक फोडून बाहेर पडण्याइतका चढला आहे याची खूण आहे आम्हाला सवयीने माहीत होतं. पण याची काहीच कल्पना नसल्याने बार्बराने आपलेच घोडे दामटले.' यू नो व्हॉट गोज वेल विथ इंडियन चिकन? इंडियन बियर' असं म्हणून एक बियरची बाटली टेबलावर ठेवली. आता मात्र बाबा तिथून निघूनच गेले. आईने तिला 'आम्ही कर्मठ ब्राह्मण आहोत, आम्ही मांस खात नाही वगैरे जुजबी समजूत घातली आणि कशीबशी जेवणं उरकली.
दुपारी चहाच्या वेळी ती आपल्या खोलीतून बाहेर आली. तिने लॅपटॉप सुरू केला आणि दादाचे फोटो दाखवायला सुरुवात केली. समुद्रकिनाऱ्यावर पोहोण्याच्या पोषाखात दादा आणि अत्यंत तोकडे कपडे घालून त्याला खेटून उभी असलेली बार्बरा पाहून आई-आजीला धरणी आपल्याला पोटात घेईल तर बरे असं वाटायला लागलंय हे स्पष्ट दिसत होतं. पुढचे फोटो पाहणं नको म्हणून बाबा बाहेर निघून गेले. आई स्वयंपाकघरात गेली आणि आजीने डोळे मिटून जप करायला सुरुवात केली. दोन दिवसात आमच्या घरातलं वातावरणच बदललं. दादाने जर या बयेशी लग्न केलं तर काय होईल या चिंतेने आईला रात्री झोप लागेनाशी झाली. केवळ पाहुण्यांशी नीट वागलं पाहिजे म्हणून आई सगळं ओढत होती. बार्बराच्या परत जाण्याच्या दिवसाची सगळेच वाट बघत होते. या सगळ्यावर कळस ठरणारी गोष्ट दुसऱ्या दिवशी सकाळी घडली. सकाळी अंघोळीला म्हणून बार्बरा मोरीत शिरली आणि आतून कोरड्या ओकाऱ्यांचे आवाज यायला लागले तेंव्हा मात्र आजीने हाय खाल्ली. आमच्याकडे लग्नाआधी मुलं झालेली चालत नाहीत वगैरे गोष्टी बार्बराला कशा समजावून सांगायच्या या विचाराने आईची अवस्था अगदी वाईट झाली. उरलेला वेळ भयंकर तणावाखाली गेला. आजीने "विवेकला सद्बुद्धी मिळावी" म्हणून विश्वेश्वराला नवस बोलायला सुरुवात केली. बार्बरा सून म्हणून घरी आली आहे या कल्पनेनेच आई बाबांचे चेहरे उतरले. नकळत काही दिवसांपूर्वी घडलेला प्रसंग मला आठवला. माझ्या आत्याच्या मुलाने एका तेलुगू ख्रिश्चन मुलीशी पळून जाऊन लग्न केल्यामुळे घरात हाहाःकार उडाला होता. आत्या धाय मोकलून रडत होती आणि बाबा तिच्या अकलेचा उद्धार करत होते.
"याच्यासाठी मुलांना फालतू स्वातंत्र्य द्यायचं नसतं..."
"दादा, ही वेळ तुझ्यावर येईल तेंव्हा कळेल तुला..."
"माझ्या मुलाने जर असं काही केलं तर मी त्याच्या तोंडावर दार धडकवून त्याला घराबाहेर हाकलून देईन..."
"बघू या काय होतंय ते.."
आता हा प्रकार आत्याच्या कानावर गेल्यावर ती कशी हसेल याच्या कल्पनेने मला फुटलेलं हसू लपवायला मला टेबलाखाली लपावं लागलं.
अखेरीस बार्बराचा परत जाण्याचा दिवस उजाडला. डोक्यावरून एखादं मणामणाचं ओझं उतरावं अशा आविर्भावात बाबा तिला घेऊन विमानतळावर निघाले. तिला सोडून घरी परत आल्या आल्या दादाला फोन करायचा असा त्यांनी निश्चय केला होता.
गंमत म्हणजे दादाचाच फोन आला. त्याची कॉलेजमधली मैत्रीण कोचीनमधे एका कॉन्फरन्ससाठी येणार होती. हैदरबादला एका प्रथितयश संस्थेत ती चाईल्ड सायकॉलॉजिस्ट म्हणून काम करत होती. तिचं नाव डॉ. समीरा शेख. ती दोन दिवसांनंतर येणार होती. दादाने तिचीही काही दिवस आमच्या घरी राहण्याची व्यवस्था केली होती. दादाने तिला आणायला जायची बाबांना गळ घातली. नाईलाजाने बाबा हो म्हणाले. मग काय दोन दिवसांनी पुन्हा एकदा बाबा आणि मी विमानतळावर हातात 'वेलकम समीरा' चा फलक घेऊन उभे. थोड्या वेळाने नाजूक नक्षीचं भरतकाम केलेला सुंदर सलवार कुडता घातलेली एक मुलगी आमच्या दिशेने आली. तिचे केस खूप लांब आणि सुंदर होते. छानसं हसत तिने बाबांकडे बघून हात जोडले.
"नमस्कार" ती म्हणाली. बाबा एकदम खूश झाले.
"नमस्कार!"
"कशी आहेस वैजयन्ती?"
"मजेत आहे" आम्ही घरी आलो.
आता आपल्यापुढे कोणतं ताट वाढून ठेवलं आहे या काळजीने अर्धमेल्या झालेल्या आई-आजीने सोडलेला निःश्वास मला कळला. आत आल्याआल्या तिने आजीला वाकून नमस्कार केला आणि पिशवीतून एक सुरेखशी शाल काढून तिच्यासमोर ठेवली. समीराने आईसाठी साडी आणि माझ्यासाठी हैदराबादी बांगड्या आणल्या होत्या.
"असंच गंमत म्हणून..." असं पुटपुटत ती हात-पाय धुवायला गेली. थोड्या वेळाने आईने जेवायला हाक मारली. समीरा माझ्या शेजारी बसली होती. पानात वाढलेले पदार्थ पाहून ती छान हसली.
"सांबार फारच सुंदर झालंय... मला कधीच जमत नाही असं सांबार..." समीरा आईला म्हणाली.
"त्यात काय मी शिकवीन की तुला..." आजवर आईने कोणत्याही मुसलमान माणसाला तिच्या स्वयंपाकघराचा उंबरा ओलांडू दिला नव्हता. पण त्या दिवशी दुपारी सगळं काही धुडाकावून लावत समीराला घेऊन आई स्वयंपाकघरात गेली आणि अस्सल अय्यर सांबार कसं करायचं हे तिला शिकवायला आईने सुरुवात केली. दोन दिवस देवघरापासून समीरा कटाक्षाने दूर रहात होती. तिसऱ्या दिवशी बाबांनी आपणहून तिला हाक मारली आणि आपल्या देव्हाऱ्यातल्या मूर्ती तिला कौतुकाने दाखवायला सुरुवात केली. आपल्याला कुठल्या मूर्ती वारशाने कशा मिळाल्या हे तिला सांगण्यात ते अगदी रंगून गेले होते.
समीरा घरी आल्याला तीन दिवस उलटून जातात न जातात तोच विवेकने बायको म्हणून हिचीच निवड करावी असे नवस बोलायला सुरुवात झाली होती. त्या आठवड्यातल्या शनिवारी अचानक जेंव्हा दादा घरी आला तेंव्हा तर समीराचं 'स्थळ' त्याच्यासाठी खुद्द आईबाबांनीच पसंत केलं असावं अशा आविर्भावात त्यांनी तिची दादाशी ओळखही करून दिली. माझी मात्र हसता हसता अक्षरशः पुरेवाट झाली होती.
दोन महिन्यांनी दादा आणि समीराचं लग्न झालं.रिसेप्शनच्या वेळी अमेरिकेतून दादाच्या सेक्रेटरीने म्हणजेच बार्बराने एक मोठ्ठा फुलांचा गुच्छ खास तिकडून पाठवला होता. त्याला जोडलेल्या कार्डावर लिहिलं होतं
"फ्लॉवर्स २ डॉलर
पोस्टेज १० डॉलर
ट्रिप टु इंडिया १५०० डॉलर
इंडियन व्हॅल्यूज प्राईसलेस"

--अदिती

गाजराची पुंगी!

कधी जायचा निघून विखार
कधी यायचे फुलून शिवार

नवी मागणी हरेक क्षणात
पुरे व्हायचा कुठून पगार

तुला पाहता उदास मनात
पुन्हा यायचे भरून विकार

तुला पाहता समोर क्षणात
पुन्हा जायचे पळून विचार

नवा डाव हा , जरी जन तेच
करा तोच ओरडून प्रचार !

--अदिती(१९ ऑक्टोबर २००६)
धनत्रयोदशी, शके १९२८

27 सितंबर 2006

दिगंत

का दाटून येतात या उदास छाया
श्रांत विझल्या त्रस्त जिवाला पुन्हा छळाया

दूर क्षितिजापार करडी रेघ आहे
पिवळे उदास गवत खोळंबून राहे

सैरावैरा स्वैर धावती दुखऱ्या वाटा
बंध कुणाचे छंद कुणाला उरले आता

दूर डोंगरांवरून उरल्या जुनाट राया
हरवून गेल्या सुखस्वप्नांची केवळ माया

उदासवाणी हवेत उडती पिकली पाने
का जमिनीचा स्पर्श घडावा तया सुखाने?

चहूकडे कोंदून राहिला नीरव नाद
तरी मला का ऐकू येते दुरून साद?

आभास तुझे वेढून टाकती माझे मीपण
सांग कसे हे भोगायाचे दिगंत आपण?

--अदिती
(११.३.२००६)

5 सितंबर 2006

चले चलो!

दोन वर्षांपूर्वी पुणे विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाच्या अभ्यास सहलीसोबत आम्ही भरतपूर- रणथंबोर -आग्रा - मथुरा असा प्रवास करून आलो. तेंव्हा नुकताच स्वदेस सिनेमा प्रदर्शित झाला होता. 'स्वदेस' बद्दल प्रथमदर्शनी जाणवलेली गोष्ट म्हणजे एम-एटी वर तिबलसीट, आगगाडीत एकाच बाकड्यावरच्या पाच जणांमधला एक, नितळ स्वच्छ पण हिरवट पाण्यातून जाणाऱ्या मोठ्या तराफ्यावर बसलेला शाहरुख आणि या पार्श्वभूमीवर दिसणारं चित्रपटाचं घोषवाक्य "we the people!" तशीही चित्रपटाच्या कथानकाच्या ओघात अगदी उपग्रहापासून, रॉकेटपासून ते बैलगाडीपर्यंत विविध वाहतुकीची साधनं पहायला मिळतात. त्याच सुमाराला उत्तर भारताच्या एका लहानशा तुकड्याला आम्ही दिलेल्या भेटीतही ही वाहनांची विविधता मनापासून अनुभवयाला मिळाली. या प्रवासाचं एका खासगी मासिकासाठी मी लिहिलेलं हे प्रवासवर्णन.(खरं सांगायचं तर प्रवासात 'घडलेल्या' वाहनप्रवासाचं वर्णन!)
भरतपूर रणथंबोर ही अनुक्रमे राष्ट्रीय पक्षी अभयारण्य आणि राष्ट्रीय प्राणी अभयारण्य आहेत. डिस्कव्हरी - ऍनिमल प्लॅनेट - नॅट जिओ च्या प्रेक्षकांना रणथंबोरबद्दल अधिक काही सांगायला नकोच. झपाट्याने कमी होत असलेल्या भारतीय वाघांचं अर्थात ज्याला बेंगाल टायगर या नावाने ओळखलं जातं त्या भारतीय वाघाचं हे वसतिस्थान आहे. देव करो आणि इथलीच नाही तर जगातली वाघांची संख्या वाढती राहो. भरतपूर हे विविध प्रकारचे दुर्मिळ पक्षी , पाणपक्षी, सारस, घुबडं वगैरे पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. अतिशय दुर्मिळ झालेली छोटी पांढऱ्या घुबडांची एक जोडी आम्हाला इथे बघायला मिळाली आणि धन्य झाल्यासारखं वाटलं. अशीच गुलाबी - करकरणाऱ्या पंखांची आणि केशरी टोकदार चोचींची काळ्या गिधाडांची एक जोडी रणथंबोरला पाहिली. काही वर्षांनी हे दोन्हीही पक्षी नामशेष होण्याची भिती आहे.(गिधाडांवर नुकताच एक अतिशय सुरेख वृत्तचित्रपट डिस्कव्हरी वर पाहिला. रामायणकालीन ज्ञात पक्ष्यांपैकी असलेले हे प्रचंड गृध्रराजही आता झपाट्याने कमी होत आहेत हे पाहून काळजाला अक्षरशः घरं पडली. पण त्याबद्दल पुन्हा सावकाशीने..)
या प्रवासात विमान सोडलं तर बहुतेक सगळ्या वाहतुकीच्या साधनांमधून आम्हाला प्रवास घडला. सहज मनात विचार आला की खरंच आपल्या जीवनाला गती देण्यात या वाहतुकीच्या साधनांचा किती मोठा वाटा आहे!.पूर्वी जेंव्हा वाहतुकीची साधनं आजच्याइतकी प्रगत झालेली नव्हती तेंव्हा देवाने प्रदान केलेले दोन पाय हेच प्रवासाचं प्रमुख साधन होतं. त्यामुळेच त्याला यातायात असा शब्द आला आहे. मराठीमधे यातायात करावी लागणे म्हणजे खूप कष्ट - धावपळ करावी लागणे. खरोखरच लांब अंतरावरचा प्रवास पायी चालत करणे हे अतिशय कष्टाचं काम आहे. गोपाळ भटजींचे "माझा प्रवास" हे पुस्तक वाचताना याचा साक्षात प्रत्यय येतो. कदाचित म्हणूनच पायी तीर्थयात्रा करत करत काशीची गंगा रामेश्वराला नेऊन वाहणे अतिशय पुण्यप्रद मानले गेले असेल. भरतपूरमधे अजगरांची बिळं शोधण्यासाठी मी एकवीस किलोमीटर चालले तेंव्हा पायाला चक्रे लावणे म्हणजे काय ते कळालं! पायी चालताना दम लागला की तोंडाची चक्रं(टकळी!!!) बंद होतात, मन अंतर्मुख होतं आणि आजूबाजूच्या नीरव शांततेचा आपण भाग होऊन जातो हे मला जाणवलं. मधून मधून येणारे पक्ष्यांचे आवाज आणि आपल्या पावलाखाली चुरडला जाणारा पाचोळा अशा वातावरणातून अडीच तास चालताना शांतता ऐकण्याचा एक अवर्णनीय अनुभव मी घेतला. तत्त्वचिंतनासाठी ऋषीमुनी आणि मोक्षप्राप्तीसाठी मुमुक्षु अरण्याचा मार्ग का धरत असतील हे थोडंसं कळल्यासारखं वाटलं.(पाडस मधला पेनी गाव सोडून जंगलात का गेला त्याचीही आठवण झाली)...
पायी चालणाऱ्या माणसांनी घोडे-हत्ती-खेचरं-गाढवं अशा प्राण्यांचा वापर प्रवासासाठी वाहन म्हणून करायला सुरुवात केली. ज्याच्याकडे प्राणी जास्त त्याचा मान मोठा होता. प्राणी हे धन मानण्यात येई. श्रीसूक्तात संपत्ती दे अशी प्रार्थना करताना "अश्वदायी गोदायी धनदायी महाधने" अशी लक्ष्मीला विनंती केली आहे. मला जेंव्हा आईने ही ओळ समजावून सांगितली, सरमा- पणींची गोष्ट सांगितली तेंव्हा मी खूप लहान होते. गायीला धन मानायचं या कल्पनेने मला हसू आलं होतं. पण प्राण्यांना धन मानतात म्हणजे काय याचा प्रत्यय जयपूरच्या आमेरगढ किल्ल्यावर जाताना आला. तेरा-चौदाशे पायऱ्या चढून जाण्याला दुसरा पर्याय म्हणजे राजेशाही थाटात हत्तीच्या पाठीवर बसून जायचं हे पाहून मी भलतीच खूश झाले होते(नुकतंच जेवण झालं होतं... अशा वेळी चौदाशे पायऱ्या चढायच्या? त्यादेखील फक्त मुघल - ए - आझम चं चित्रीकरण जिथे झालं ती जागा बघायला? काय वेडबीड लागलंय का?) पण आमचे हवेतले मनोरे हवेतच कोसळले. मुंबई ते जयपूर प्रवासाइतकं भाडं फक्त एक आमेरगढ हत्तीवरून बघायला द्यावं लागतं हे पाहून मला आयुष्यात पहिल्यांदा मी तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला आले नाही किंवा माझा जन्म अमेरिकेत झाला नाही(अजूनही गोरा साहेब म्हणतो ते ब्रह्मवाक्य मानून त्यांच्यापुढे लाचार गुलामगिरी दाखवत हिंडणारी आणि एतद्देशीयांकडे दुर्लक्ष करून परदेशी लोकांपुढे लाळ घोटणारी खूप लोकं मला या प्रवासात दिसली. फिरंग्यांचा राग तर येत होताच पण तरीही चौदाशे पायऱ्या?... असो) याचं मला जरा वाईटच वाटलं. एकूणच हल्लीच्या काळातही प्राणी = धन हे समीकरण कायम आहे हे पाहून धन्य वाटले.
राजस्थानात गेलो होतो पण मरुभूमीत जाणं झालं नाही त्यामुळे वाळवंटातलं जहाज अर्थात उंटावरून शेळ्या हाकायला किती पैसे पडतात हे समजू शकले नाही..त्यामुळे 'उंटावरचं शहाण'पण मी पुढच्या ट्रिपसाठी राखून ठेवलंय.
पायी चालणं, मग प्राण्यांच्या पाठीवर स्वार होणं यानंतर जागतिक ,सामाजिक सर्वसमावेशक, सर्वपरिवर्तक क्रांत्यांमधे सर्वात महत्त्वाच्या क्रांतीचा म्हणजे चाकांचा क्रम लागतो. माणसाला चाकाचा शोध लागला आणि काळाची - युगाची गती अनेकपटींनी वाढली. (चाक किंवा चक्र म्हटलं की चटकन अनेक संदर्भ आठवतात. महाभारतातला तो "मै समय हू, मै अक्षय और अनंत हू वाला हरीश भिमाणींचा धीरगंभीर आवाज, पुलंचं "टायर बसली की आधी पंक्चर होतो तो ड्रायव्हरचा चेहरा पासून ते रडीचा डाव खडी खेळणारा अर्जुन, बिचाऱ्या कर्णाचं चाक जमिनीत रुतल्याची ती पेपरात लिहिलेली कथा" ते "चक्रवत् परिवर्तन्ते" किंवा "चक्रनेमिक्रमेण" ते पार सवाई मधे ऐकलेला मालिनीबाईंचा चक्रधर इथपर्यंत. असो विषयांतर पुरे)
या चाकाच्या संदर्भात अत्यंत मनोरंजक पण हळहळ वाटायला लावणारी गोष्ट मी वाचली ती मीना प्रभूंच्या 'मेक्सिकोपर्व'या पुस्तकात.माया संस्कृतीमधे गणित ,त्यातूनही खगोलीय गणित या विषयात अतिशय आश्चर्यकारक आणि थक्क करून सोडणारी प्रगती झाली. पण त्यांच्याकडे चाकाला देवाचं रूप मानत असत त्यामुळे देवाघरची फुलं असलेल्या लहान मुलांनाच फक्त चाकांची खेळणी वापरायला परवानगी होती. मोठ्या माणसांना चक अस्पर्श्य होतं. आपल्याच प्रगतीच्या चालत्या गाड्याला खीळ घालणारी ही दुर्दैवी माणसं पाहून हळहळ वाटल्याशिवाय राहत नाही.
चाकाचा शोध लागला आणि कुंभाराच्या चाकापासून रहाटापर्यंत आणि नंतर चक्राकार अशा 'सबसे बडा रुपैय्या' पर्यंत सगळी समाजव्यवस्था चक्र लावून पळू लागली.याच चाकाचा अतिशय सुरेख उपयोग करून भौतिकशास्त्राचे चालतेबोलते प्रतीक असे एक वाहन बनवले गेले ते म्हणजे सायकल. असं म्हणतात की पूर्वी सायकलींच्या चाकात हवा भरत नसत. किंबहुना हवा भरायच्या रबरी नळीशिवाय नुसत्या धातूच्या गोलाकार चाकांवर एके काळी सायकली डगडगत असत. रबराचा शोध लागला आणि कोणालातरी या धातूच्या गोलांवर रबरी नळ्या बसवून त्यात धक्कारोधक म्हणून हवा भरण्याची अभिनव कल्पना सुचली आणि त्यातूनच तयार झाली आजची सायकल. भा. रा. भागवतांचा फुरसुंगीचा फास्टर फेणे वाचला तेंव्हापासून त्याची ती हडकुळी माझ्यासाठी असूयायुक्त प्रेमाचा विषय बनली होती. सायकलचा सार्वजनिक वाहतुकीतला प्रकार म्हणजे सायकल रिक्शा. जयपूरसकट उत्तर भारतात आजही सायकल रिक्षा मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. पण एकाच माणसाने छाती फुटेपर्यंत सायकल 'मारायची' आणि इतर आळशी गव्हाच्या जड पोत्यांचं वजन ओढून न्यायचं ही कल्पनाच आपल्याला पटली नाही.
जेंव्हा डिझेल इंजिनाचा शोध लागला तेंव्हा एक मोठी क्रांती झाली. तोपर्यंत समाजातले धनाढ्य - बडे लोक हौसेने बग्ग्या, मेणे , पालख्या आणि कोण जाणॆ काय काय वापरायचे. पण डिझेलच्या इंजिनावर धावणाऱ्या स्वयंचलित चारचाकी गाड्या आल्या आणि या उच्चभ्रू वर्गाला आपली मिजास दाखवण्याची नवी साधने मिळाली.(याही विषयावर डिस्कव्हरी - हिस्टरी वाहिन्यांना तोड नाही. सर हेन्री फोर्ड यांच्या मोटारी बनवण्याच्या प्रयोगातून साकारलेली यशाची दंतकथा नुकतीच पाहण्यात आली. अप्रतिम लघुचित्रपट. जरूर पहावा असा..) आमच्या या इवल्याशा प्रवासात अगदी क्वालिसपासून ते उत्तर प्रदेश राज्य परिवहन अर्थात UPST पर्यंत बऱ्याच गाड्या घडल्या. आग्र्याला तेजोमहालयाने एक दिवस हुलकावणी दिली आणि दुसऱ्या दिवशी मात्र व्यवस्थित दर्शन दिले. तिथून मथुरेला कृष्णजन्मभूमीचे दर्शन घेऊन आम्हाला रात्री भरतपूर गाठायचे होते. त्या खाजगी बसवाहकाकडे राज्यांची सीमा ओलांडण्यासाठी आवश्यक परवाना नसल्याचे आम्हाला कळले तेंव्हा रात्रीचे नऊ वाजले होते. आम्ही मथुरेत! आता यमुना ओलांडून गोकुळाला जायचे की काय अशी एक गंमतशीर कल्पना मला सुचली. तेवढ्यात आमच्या चालकाने मार्ग काढला. आणि आम्हाला बसस्टँडवर नेऊन सोडण्याचे कबूल केले. बऱ्यापैकी मोठ्या प्रवासी बसमधे सामानासकट आम्ही पंचावन्न जण कसेबसे मावत होतो. आता सार्वजनिक राज्यपरिवहन म्हणजे आमचे कसे होणार या चिंतेने मी परमेश्वराची करुणा भाकायला सुरुवात केली. स्टॅंडवर आमची पलटण उतरली तेंव्हा रात्रीचे ११:३० झाले होते.तिथे समोर उभा असलेला चारचाकी प्रकार पाहून धडकीच भरली. न राहवून पु लं च्या " मायदेशीच्या यस्टीच्या खडखडाटावर आवाज काढून "वाला खडखडाट आठवला. बाहेर प्रचंड थंडी. थंडी अगदी मी म्हणत होती. थंडी मी म्हणत होती की दात आम्ही म्हणत होते हे कळणं अवघड होतं कारण दात कडकड वाजत होते. सामानासकट आम्ही बशीत कसे मावणार याची चिंता लागली होती. रस्त्यावर प्रचंड धुकं. चार हातांपलिकडलं दिसत नव्हतं. रात्र बरीच झाली असल्यामुळे आणि प्रचंड दमल्यामुळे अनावर होऊ पहात असलेली झोप अशा सगळ्या परिस्थितीत त्या धुडात शिरलो. आत चुरगाळून फेकलेली तिकिटं, पालापाचोळा असा केराचा हा ढीग साठलेला. एकतर आम्ही किंवा सामान असा "mutually exclusive" प्रकार होणार असं वाटत होतं. पण ती बसमाऊली चक्क प्रेमळ निघाली. खिडक्यांच्या काचा खडखडत नव्हत्या. झोंबरं वारं आत शिरत नव्हतं. चालकाचं आसन जाळीपाठीमागे होतं आणि त्याच्याशेजारी म्होप जागा होती. गियरबॉक्सशेजारी आमचं सामान (आणि त्यावर चार इतर प्रवासी!) आरामात मावलं. दहा मिनिटे घालवून चालकाने धुक्यात वाट दाखवणारा विशेष दिवा बसवून घेतला. ती त्या दिवशीची शेवटची गाडी होती. पण आम्ही प्रचंड बहुसंख्येने पोचल्यामुळे हाऊसफुल्ल! त्यामुळे तोही बापडा खूश झालेला असावा. अखेरीस कानाला मफलर घट्ट गुंडाळत त्याने गिअर टाकला आणि असा काही खणखणीत आवाज करून गाडी पळायला लागली की बास! साऱ्या शंका कुठच्या कुठे पळाल्या. शिवाय वाकडी वाट करून तिने आम्हाला हॉटेलच्या दारात सामानासकट आणून सोडलं. जी बस भितीदायक डाकीण वाटत होती तीच आमची प्रेमळ मैत्रीण ठरली. (त्या मार्गावर दरोडे आणि लुटालूट सर्रास चालते आणि रात्रीच्या वेळी तो तसा निर्जन असल्यामुळे हा धोका अधिक वाढतो हे नंतर भरतपूरला पोहोचल्यावर कळलं आणि जीव पुन्हा एकदा भांड्यात पडला..)याबद्दल उत्तर प्रदेश राज्य परिवहनाचे जितके आभार मानावेत तितके थोडेच!
या बस इतकाच विस्मयकारक प्रकार होता तो म्हणजे तिथल्या रिक्शा (सायकल रिक्शा नव्हेत आपल्या नेहमीच्या स्वयंचलित रिक्शा) मुळात रिक्शा हा जपानी शब्द आहे. रिकु म्हणजे प्रयत्न किंवा श्रम. श्या म्हणजे गाडी . जी श्रम लावून ओढली जाते ती गाडी म्हणजे रिक्शा. भारतीय रिक्शाचं कौतुक आणि चेष्टा सतत सुरूच असते उदा. एम,टी.व्ही वरची जाहिरात. सर्वात जास्त माईलेज देऊन चार माणसांना घेऊन जाणारे वाहन म्हणून तिचं मॉडेल लंडनला वस्तुसंग्रहालयात ठेवलंय म्हणे. या वर्णनाप्रमाणे पुण्यात तीन(च!) प्रवासी आणि एक गाडीवान अशा रिक्शा बघायची सवय होती(पुण्यातल्या रिक्शा आणि त्याहूनही रिक्शावाले हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे....असो) पण मथुरेतले रिक्शावाले काका फारच दिलदार वगैरे निघाले. त्यांनी चालकाच्या आसनाच्या दोन्ही बाजूंना फळ्या लावून, मागच्या बाजूला टांग्यासारख्या विस्तारित आसनांची सोय करून एकेका रिक्शातून १०-१२ सवारी नेण्याची धमाल सोय केली आहे.हा प्रकार पाहून मी तर चाट पडले बाबा. फेविकॉलची पारितोषिकप्राप्त जाहिरात जगल्यासारखंच वाटलं मला. (लंडनला खरं म्हणजे हा नमुना ठेवायला हवा! रिक्शाच्या मूळ निर्मात्यांनाही तो पाहून झीट यावी.. असो)
चारचाकी स्वयंचलित मोठ्या गाड्यांमधे सर्वात सुंदर अनुभव मिळाला तो रणथंबोरमधे. तिथल्या आरटीडीसी च्या एका हॉटेलमधे आम्ही मुक्कामाला होतो. आम्हाला स्टेशनवरून आणण्यापोचवण्यापासून अरण्यात हिंडण्यापर्यंत बऱ्याचशा कामांसाठी तिथे कँटर्स होते. आपली बस साधारण खिडकीच्या पातळीला आडवी कापली आणि तिचं छप्पर काढून टाकलं की कॅंटर तयार होतो. कँटर या इंघ्रजी क्रियापदाचा अर्थ होतो रमतगमत जाणे. अशा या कॅंटर्समधे पुन्हा एकदा सामानासकट आम्ही मावलो. रात्रीचे १२ वाजले होते. सगळीकडे अंधाराची जाड चादर अंथरलेली होती. अशा वेळी खाली आम्ही आणि वर आकाशात शेकडो लखलखते हिरे असा तो ताशी साठ कि.मी. च्या वेगाने केलेला प्रवास खरंच अविस्मरणीय. शेजारीच जंगल होतं आणि शहरी मनुष्यवस्ती दूर होती. त्यामुळे रात्रीच्या प्रखर दिव्यांचे झोत आसमंतात भेसळ करत नव्हते. अशा वेळी आकाशगंगेची खोली कळत होती. याच वैशिष्ट्यपूर्ण कॅंटरमुळे जंगलात झाडावर आपलं शिंग घासणारं एक मोठं सांबर अगदी सहज हात लावता येईल इतक्या जवळून पाहता आलं.(व्याघ्रराजांनी मात्र आमच्यासारख्या यःकश्चित क्षुद्र जीवांकडे साफ दुर्लक्ष केलं. एका बिबळ्याला लांबूनच पाहून वानरांनी केलेला कोलाहल सोडल्यास वाघ असा तो रणथंबोर चा छाप असलेल्या माझ्या आणि माझ्या भावाच्या टोप्यांवरच पहायला मिळाला. पण एका वाघिणीच्या पिल्लांचे ताजे ठसे मात्र दिसले. तिच्या पिल्लाचा पंजा आत्ताच तिच्या पंज्यापेक्षा मोठा झाल्याचं तिथला वनरक्षक मोठ्या कौतुकाने आम्हाला सांगत होता. मला एक क्षणभर त्याचा हेवा वाटला..)
या सर्व प्रवासात राहून गेलेला एक प्रवास आम्हाला त्याच्या आधल्यावर्षी घडला होता. भारतीय रेल्वेचं पश्चिम किनारपट्टीवरचं समुद्राजवळचं शेवटचं स्थानक असलेल्या ओख्याला उतरून आम्ही द्वारकेजवळच्या एका बेटावर मुक्कामी राहण्यासाठी चाललो होतो. बोटीत बसलो. सगळं काही स्थिरस्थावर झालं. संध्याकाळ अगदी टिपेला पोहोचली होती. पण एक प्रश्न उभा राहिला.त्या दिवशी नेमकी ओहोटी होती. ती संपून खाडीतली पाण्याची पातळी पुन्हा वाढेपर्यंत आम्हाला पुढे जाता येणार नव्हतं. मग काय! बोट त्याच जागी गोलगोल फिरु लागली. तेंव्हापासून पुढे जमिनीवर पाऊल ठेवेपर्यंतचे दोन तास मला खलाशी मंडळींबद्दल अपार आदर दाटून आला. नकळत ओशन ट्रँगलपासून ते एम टी आयवा मारू पर्यंत सगळ्या समुद्रसफरी डोळ्यांसमोर तरळून गेल्या. महिने महिने जमिनीचं दर्शनही न घडता खलाशी मंडळी कशी राहू शकतात याचं नवल वाटलं. आजवर वाचलेल्या खलाशीकथांमधले सगळे संदर्भ नकळत पटले.देव खलाश्यांचं भलं करो!
पण सगळ्यात सुखाचा आणि मजेचा प्रवास म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेची जीवनरेखा अर्थात भारतीय रेल्वे! गाडी सुटायला अवघी पाच मिनिटे उरलेली असताना आम्ही ती कशी पकडली, दोनच मिनिटांचा हॉल्ट असलेल्या स्थानकावर ५५ माणसांची टीम दीड मिनिटात सामानासकट कशी उतरवली, आम्ही सगळे खाली उतरेपर्यंत टीसी लाच कशी काळजी वाटली, रेल्वेतलं जेवण, कुल्हडमधला चहा, प्लॅस्टिक पिशवीतून पाणी वगैरे गोष्टी अतिशय हृद्य आठवणींचा भाग बनून गेल्या आहेत. तालवाद्यांना तालाचे तुकडे सुचविणारी अतिशय नादमय आणि गतिमान अशी ही आगीनगाडी पुण्याच्या मायभूवर आम्हाला उतरवून यार्डात गेली आणि मला एकदम चाकं लावून घरी जावंसं वाटलं.
शेवटी काय? सारं जीवन हा प्रवास आहे आणि विविध साधनांनी तो प्रेरित केलेला आहे. पृथ्वीच्या पाठीवर बसून कित्येक मैलांचा अंतरिक्षाचा प्रवास आपण करत असतोच की. पृथ्वीचा गोलाकार चाकाच्या गोलाकाराशी आणि चाकाचा गोलाकार घड्याळाच्या गोलाकाराची संतुलन राखून असतोच ना!
त्यामुळेच..
'कायदा पाळा गतीचा काळ मागे लागला, थांबला तो संपला,धावत्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे'
हेच खरं.
--अदिती

30 अगस्त 2006

ही रात्र संपते आहे

जे सांगून समजत नाही
समजावून उमजत नाही,
अंतरास जाळत जाते
शब्दांना गवसत नाही।

ते अटळ मूर्तसे सत्य
मी समोर पाहिले पुरते
मग पुरेपूर जाणवले
क्षण उरले ना यापरते।

डोळ्याला भिडता डोळा
काळाचे पंख थबकले
मन चरचरले चाचरले
मग कायमचे उगी झाले।

मन बुद्धी एकच झाले,
अबोल पूर्णता भरली
बोलण्यास काही ना उरले
प्राक्तनी भोगही सरले

ना उरली काही नाती
ना पाश बंध ना मुक्ती
नशिबाची फिटली दाने
आता ना संग ना विरक्ती

सत्याचा धरूनी हात
मी वाट चालते आहे
दुवा दोन सूर्यांचा
ही रात्र संपते आहे....

--अदिती(१६ एप्रिल २००६)

गुरुचा थोरवा

(सध्या मनोगती नेहेमीप्रमाणे निरनिराळ्या वादांमधे मन लावून गर्क झालेले आहेत. गुरू-शिष्याच्या नात्यावरून आणि संगीतासारख्या पवित्र गोष्टीवरून चाललेल्या दुर्दैवी वादाने मला फार क्लेष झाले. मग मन शांत करायला म्हणून ध्यान लावून बसले असता काही मनोगतींच्या 'आतला' आवाज अचानक माझ्या कानावर पडला. तो ऐकून फारच विस्मय , अचंबा वगैरे झाल्यामुळे तो जाहीर करते आहे. आतल्या आवाजातले हे स्वगत मला फार उद्बोधक वाटले बुवा! ः ःड
ज्या सोनियादेवींनी आतल्या आवाजाची ही थोर देणगी या देशाला दिली त्यांच्याबद्दलचा माझा आदर शतगुणित झाला आहे हेही जाता जाता ध्वनित केलेले बरे. हाच ऋणनिर्देश समजावा..
--अदिती)

गुरूचा थोरवा । आम्हासीच ठावा
कसा तो जाणावा । गबाळाने?

आम्हीच करितो । खरी गुरुभक्ती
दावुनिया शक्ती । नमवितो

सारखे काढून । तेच तेच गळे
भक्तीचे उमाळे । दाखवतो

आम्ही रंगवितो । भक्तीला गुद्द्याने
येवढ्या मुद्द्याने । जग नमे!

गुरुला ठेवून । शिरी मिरवावे
असे दाखवावे । खोटे दात

आतल्या दातांनी । खावे दातओठ
विरोधकां मूठ । दाखवावी

गुरूचा वापर । प्रदर्शनासाठी
विरोधाला काठी । उगारावी

कष्टाने साधते । अशी दिव्य कला
सांगता सकला । काय उरे

संगीत आमुच्या । आखाड्याची माती
करूनिया कुस्ती । दमवावे

हलवाई खोटा । मिठाईही खोटी
संगीताची लोटी । डबोल्याची

क्लासास जाऊन । शिकतात विद्या
अशा विशारदां । काय कळे

रहावे तयांनी । खुशाल उपाशी
प्रसादाची बशी । विसरावी

नसावा आक्रोश । टोचता लवंग
लिखाण सवंग । मान्य व्हावे

असे होती जगी । शिष्य आणि भक्त
तोचि दिन सत्य । मानावा हो

--अदिती
(२५.७.२००६)

7 जुलाई 2006

हॅरी पॉटर......

हॅरी ची गोष्ट लोकांना इतकी का भुरळ घालते आहे यावर सध्या सर्वत्र ऊहापोह सुरु आहे. मला विचाराल तर अद्भुताचं आकर्षण सर्वांनाच असतं. जादू ही अनाकलनीय आणि कल्पनेच्या पलिकडे असते म्हणूनच तिचं प्रचंड आकर्षण आपल्याला वाटतं. हॅरीच्या दुनियेचं वैशिष्ठ्य म्हणजे ती जितकी अद्भुतरम्य आहे तितकीच मानवी पण आहे. हे सगळे जादूगार(जादूने गाssssर करणारे !) आणि जादूगारिणी (चेटकिणी !) खरोखरच सामान्य लोकांसारखे वागतात. त्यांनाही आपल्यासारखेच प्रश्न असतात. जादूने त्यांचं आयुष्य कितीही वेगळं झालं असलं तरीही त्यांच्यासमोरची आव्हानंसुद्धा तितकीच वेगळी (प्रसंगी अवघड) आहेत (लॉर्ड व्होल्डेमॉर्ट). सर्वसामान्य दुष्ट जादूगाराच्या प्रतिमेला विसंगत अशी यातली माणसं प्रेमळ(हॅग्रिड,मॉली वीझली),ऋषीतुल्य आदरणीय(अल्बस डम्बलडोर) , आपल्या प्राणाचही बलिदान करण्यास मागेपुढे न पाहणारी (लिली पॉटर,जेम्स पॉटर,सीरिअस ब्लॅक) अशी सुद्धा आहेत. या त्यांच्या मानवी गुणांमुळे ती आपल्यातलीच एक वाटतात. अतिशय सुंदर आणि सशक्त,घट्ट मैत्री कशी असते हेही यातून दिसतं. या पुस्तकाचे नायक लहान मुलं आहेत त्यांनाच जात्याच आपल्या कल्पनाशक्तीच्या राज्यात विहार करायला आवडतो. शिवाय या बालवीरांच्या साहसी सफरींमधे मोठे लोक त्यांना बरेचदा दुर्मिळ असं स्वातंत्र्य बहाल करताना दिसतात. जादुई प्राणी-पक्षी, जादुई आणि खास हॅरीच्या राज्यातले चमत्कार यांची तिथे रेलचेल असते. शाळेच्या एरवी रोजच्याच आणि म्हणूनच नीरस वाटणाऱ्या पार्श्वभूमीवर जादूचा अभ्यास करायचा ही कल्पना मला तर भारी रोमांचक वाटते.लहान मुलांच्या विश्वात या जादूविश्वाला अतिशय आस्थेनं सामावून घेतलं जातं यात काहीच नवल नाही. मी तर अनेक आजी-आजोबांना सुद्धा लहानांच्या बरोबरीनं या दुनियेत रंगून जातान पहिलं आहे. स्वतः मी सुद्धा एकदा पुस्तक हातात घेतलं की या जगाशी अगदी तहानभूक हरपून समरस होण्याचा अनुभव प्रत्येक वेळेला घेतलेला आहे. या पुस्तकांची अजून एक गंमत म्हणजे गोष्ट सांगायची पद्धत. जे.के.रोलिंग प्रतिभावान लेखिका आहे किंवा नाही याबद्दलच्या वादाशी मला देणघेणं नाही पण ती अतिशय सुंदर गोष्ट सांगते अर्थात ती एक कुशल सूत्रधार आहे याबद्दल दुमत असू नये. विशेषतः ज्या पद्धतीने ती मागील भागांचे दुवे जुळवून घेत घेत गोष्ट पुढे पुढे नेते त्याला दाद दिलीच पाहिजे. माझ्या दृष्टीने भाग ३,४ हे सर्वोत्तम आहेत. भाग ३ तर माझं सर्वात आवडतं पुस्तक आहे. मी हॅरीच्या राज्यात रंगून जाते कारण हे जग हॅरी आणि मी आम्हाला सारखंच नवीन असतं आणि सतत नवनवीन आश्चर्य घेऊन समोर उभं ठाकतं.या जगाची नाळ नकळत आजच्या आपल्या जगाशी जोडली जाते आणि हॅरी चं साहस माझं पण साहस होऊन जातं. असं वाटत राहतं की जादू सोडली तर हे जग आणि आपलं जग एकच तर आहे.एक कोवळा पोरका आणि अर्धवट वयातला मुलगा संपूर्ण अनोळखी जगात जिवावरच्या संकटांना एकटा तोंड देतो हे पहून आपण हॅरीशी अगदी चटकन एकरूप होऊ शकतो. तसं पाहिलं तर आपणही सगळे एकटे असतो‍च , जग आपल्यासाठीही अनोळखी आणि क्रूर असतं आणि आपल्याकडे डम्ब्लडोरांसारखे मार्गदर्शकही नसतात. त्यामुळे कुठेतरी वेगळ्याच पातळीवर हॅरीचं जग काही काळापुरतं आपलं जग होतं. मला वाटतं या पुस्तकाचं सर्वात मोठं बलस्थान हेच आहे की हे जग कल्पनेतलं असूनही खोटं किंवा पोरकट वाटत नाही.म्हणूनच लहानांइतकच मोठ्यांनाही ते आकर्षित करतं. तसं पाहिलं तर फास्टर फेणे हा माझा अनेक वर्षं अतिशय आवडता मित्र आहे. नाथमाधवांच्या वीरधवल ने आणि शशी भागवतांच्या मर्मभेदाने काही दिवस कायमचे सोनेरी केले आहेत. या आणि अशा कलाकृतींचं मोल वादातीत आहे. पण या सर्वांबद्दल सार्थ प्रेम आणि अभिमान बाळगूनही मी असं म्हणेन की हॅरी ची गोष्ट काहीतरी वेगळी आहे अणि ती वाचायची संधी मला माझ्या आयुष्यात मिळाली याबद्दल मी दैवाकडे नेहेमीच कृतज्ञ राहेन.
--- अदिती

29 मई 2006

पूरिया-धनाश्री

संध्याकाळचं तरल वातावरण असतं. सगळं सावळं झालेलं असतं. कसलीशी गूढ माया दाटून आलेली असते. सगळीकडे एक भारावलेपण असतं. अशा वेळी पूरिया-धनाश्री चे मधाळ सूर कुठूनतरी येतात. त्या हरवत चाललेल्या चैतन्यमयी प्रकाशाचा विरह अधोरेखित करतात. कातरवेळेला वाटणारी अनाम व्याकुळता चोहीकडे पसरते. तिचे पंख हळूहळू विकलतेचे पांघरूण घालू लागतात. छाया गडद होऊ लागतात. सूर्यबिंब केशरी होऊन जातं. झाडाझाडांवर पाखरांच्या किलबिलाटाला उधाण आलेलं असतं. अशा वेळी ते पूरिया-धनाश्रीचे सूर एक निराळीच ओढ लावतात. सुरांचा एक चकवा तयार होऊन जातो. त्या भोवऱ्यात गरगरत नाही पण सगळं काही विसरायला लावणारी एक छानशी गुंगी यायला लागलेली असते. काहीतरी खूप आवडणारं असं हरपत असतं. हरवत असतं हातातून कायमचं निसटत असतं. ते पकडायला जायचंय याची पाय जाणीव करून देतात. हात ते घट्टा धरू पाहतात. पण एखाद्या झोपाळलेल्या लहान बाळासारखा मेंदू त्या गुंगीच्या आधीन झालेला असतो. ते काहीतरी हातातून सोडवत तर नसतं पण आपल्यावर आपला ताबा पण उरलेला नसतो. ते सूर दूर कुठेतरी घेऊन जात असतात. दूरच्या रानात खर्जातली माधुरी घुमत असते. तिथेच ते शाम वातावरण शाममयी झालेलं असतं. ती शामवेळ मूर्त होऊन तिथे उभी ठाकलेली असते. ती फुंकर घालते. रंजवते. ते हरवण्याचं दुःख शांत क्ररते. हृदयातला तो वणवा विझतो. हळूहळू थंडावा येतो. श्रांत पण भारावलेलं मन त्या लहरींवर डोलत असतं. ही संध्याकाळ संपूच नये असं वाटत असतानाच एक एक दिवा उजळत जातो. रात्रीची ती उदार माया आपलं शांत रूप घेऊन सामोरी येते. तिच्या आईच्या मायेच्या कुशीत जीव विरून जातो. उद्या पुन्हा तेच दुःख भोगण्यासाठी तयार होत राहतो... आणि पूरिया धनाश्रीचे ते वेडे सूर मात्र त्या रानात तसेच कोंदून राहिलेले असतात.
--अदिती

25 मई 2006

मिस करतोय..

तो माझा जाल मित्र आहे"दोन ओंडक्यांची होते सागरात भेट" या उक्तीप्रमाणे या जालसागरात तरंगत असताना एका लाटेवर आमची भेट झाली. जालावर तुमच्या मनातल्या खोल तळाशी दडलेलं सगळं दुःख सहजपणे बाहेर येऊ शकतं या न्यायाला अनुसरून आणि जालामुळे मिळणाऱ्या नामानिराळेपणाचा फायदा घेत आम्ही बरेचदा सुखदुःखाची देवाणघेवाण करत असतो. नियमितपणे बोलतोच असं नाही. एकाच ठिकाणी बोलतोच असंही नाही. जाल-मुशाफिरीचे आम्ही भक्त असल्यामुळे खऱ्या - खोट्या नावांनी, मुखवट्यांसहित किंवा विरहित निरनिराळ्या ठिकाणांवर आम्ही एकमेकांशी संवाद साधत असतो.
तर हा 'तो' सध्या भारतात नाही म्हणे. त्याचं पल्याड जाण्याचं कारण तसं सर्वसाधारणाच असावं. त्या तपशिलात तो कधी शिरला नाही.मीही विचारलं नाही. प्रत्यक्ष बोलताना किंवा चिठ्ठ्याचपाट्या लिहिताना समोरचा माणूस कुठे आहे किंवा खरा कोण आहे याने तसा काहीच फरक पडत नाही. माणसांच्या जगात त्याला वाटणारा एकटेपणा तो तुमच्याशी बोलून जरा कमी करत असतो एवढंच. आणि एखाद्याला सौजन्याचे दोन बोल देऊन तुमचंही काही जात नाही. मन मोकळं करायला एक खिडकी मिळते. कन्फेशन देताना ते ऐकणारा माणूस लाकडी पेटीत का बसत असावा हे निरोपकांवर बोलल्यावर लक्षात येतं. त्याला प्रत्यक्ष डोळ्याला डोळा देऊन बोलायचं नसल्यामुळे सगळं कधीकधी किती सुसह्य होऊन जातं....
तर, पल्याड कुठेतरी बसून मला त्याचं दुःख सांगत असतो..." मी ना आईच्या हातचा चहा मिस करतोय." किंवा" मी ना मराठी बोलणं - लिहिणं मिस करतोय" किंवा "आंबे आले असतील नाही का गं... मी आंबे मिस करतोय..." किंवा "आज एक इटुकलं बाळ पाहिलं शाळेत जाणारं.. ते कित्ती प्रेमानं एबीसीडी म्हणत होतं.. मी शुभंकरोति,पाढे, परवचा मिस करतोय." असं बरंच काही. एकदा म्हणाला "इथले भारतीय लोकही आपले नाही वाटत आहेत आज. मी आपला देश मिस करतोय...." त्याचं हे मिस पुराण मी नेहेमी निमूटपणे ऐकून घेते कारण त्यावर काय बोलावं हे मला कळत नाही.(नाही म्हणायला कधीकधी तू एक्खाद्या 'मिस' ला कधी मिस करणार वगैरे कोट्या करायचा मोह अनावर होतो नाही असं नाही.... मग बऱ्याच हास्यमुद्रा वगैरे यांना पूर येतो) मग ही मिस यादी कशीही वाढते. आषाढी एकादशी, दिवाळी, फटाक्यांचा वास, चकल्या, तव्यावरची ताजी पोळी, चिमण्यांची चिवचिव, रेल्वेची शिट्टी , फोटोफास्ट चं दुकान, साबुदाण्याची खिचडी, शिवाजी पार्क, चतुर्थीचा उपास, कांदाभजी, तांदुळच्या पिठाची घावनं, वाटली डाळ, कैरीचं ताजं लोणचं, कागदी होड्या- बाण- विमानं- पतंग अशा वाट्टेल त्या सटरफटर गोष्टी त्याच्या मिस करून होतात. आणि मग "तुझी मजा आहे तुला हे सगळं फुकट(!) बिनबोभाट(!!) मनसोक्त(हे मात्र खरं ःड) उपभोगायला मिळतं अशी सांगताही होते. स्वारी आईचा पदर सोडून नुकतीच दूरदेशी गेली आहे तरी येईल हळूहळू ठिकाणावर असं म्हणून मी हे सगळं ऐकत असते. त्यामानाने मी एकदम साधी भोळी... ऑफिसमधले ताण, इतरांना मिळणारी(मला डावलून) पदोन्नती आणि सगळ्यात साधी गोष्ट म्हणजे कोडिंगमधे मला रामदासांच्या बेडकीच्या दगडासारखा अडून बसलेला अणि न फुटणारा खडक यांनी मी बरेचदा रडकुंडीला येते. मग ती रडकी कुंडी एकदाची फोडून टाकली की माझा प्रश्नही सुटलेला असतो. पण या परिघातून बाहेर पडायला फारशी मुभा नमिळाल्यमुळे मी सहज मिळणाऱ्या साध्या साध्या गोष्टींकडे लक्ष देऊ शकत नाही. थोडक्यात संतुष्ट असलेल्या मला तो कूपमंडूक म्हणतो. मग मी त्याला नर्मदेतला गोटा म्हणते. शेलक्या विशेषणांचे आदानप्रदान झाल्यावर कुठेतरी हलकं वाटतं. आमच्या गप्पा बरेचदा याच विषयावर येऊन थांबतात.परवा अचानक त्याने मला विचारलं..." ...तू काय मिस करतेयस?" नेहेमीप्रमाणे त्याचं भरपूर रडून झालं होतं. कधीही न विचारलेला हा प्रश्न ध्यानीमनी नसताना त्याने मला विचारला आणि मी नकळत बोलून गेले "मी ना... मी आयुष्य मिस करतेय."
आयुष्य या शब्दाला आमच्यात बरेच संदर्भ होते. काय चाललंय किंवा "हाऊ आर यू डूईंग" या लाडक्या प्रश्नासाठी "कसं चाललंय आयुष्य " हा प्रश्न आणि "आयुष्याला आयुष्य फक्त संदीपच(खऱ्यांचा!) म्हणू जाणे" हे ठरलेलं उत्तर ही जोडी अमर होती. उर्दूमधे ज्याला जिंदगी म्हणतात तो शब्द आयुष्यापेक्षा किती साधा आणि सुंदर आहे वगैरे चर्चाही झाली होती. "लाईफ सक्स"," छे या जगण्याला काही अर्थ नाही", "आपण वेठबिगारी कामगारच आहोत जती एसी मधे बसलो तरीही" इथपासून "ते तुम जियो हजारो साल साल के दिन हो पचास हजार" इथपर्यंत आयुष्यावर विविध प्रकारांनी टिप्पण्या करून झाल्या होत्या. त्या क्षणी या सगळ्या गोष्टी त्याच्या डोळ्यांसमोर तरळून गेल्या असणार. बोललेले न बोललेले सगळे संदर्भ त्याला लागले असणार. खात्री आहे मला तशी.
पण यापेक्षा निराळं असं काहीतरी तिथे उभं ठाकलं होतं. क्षणभरच.. जास्त नाही... पुढच्या क्षणी तो क्षण भूतकाळात गेला होता. पण तो एक क्षण पूर्ण क्षण ठरला होता. माझ्या एकाच वाक्यात मी आजपर्यंत त्याने मला ऐकवलेलं सगळं त्याला परत केलं होतं.... तो क्षण निघून गेला तरी अजूनही माझ्यासमोर तसाच आहे. आणि शेवटपर्यंत तो तसाच राहणार आहे.त्या क्षणी नक्की काय घडून गेलं माहीत नाही पण आम्हा दोघांनाही एकदम काहीतरी जाणवलं. ते काय होतं हे जाणून घ्यायचा प्रयत्न मी करणार नाही. पण आयुष्याचे श्वास भरलेल्या वाळूच्या घड्याळातल्या खाली पडून गेलेल्या क्षणांपैकी एक कायमचा लक्षात राहणारा तो एक क्षण होता एवढं मात्र नक्की.
---अदिती

15 मई 2006

लाखाची गोष्ट!

आशा हे धुळीतलं माणिक आहे. तिच्या गुणांना पूर्ण न्याय मिळू शकला नाही. कारणं काहीही असोत. राजकारण, पूर्वग्रह, प्रस्थापितांचा हेकेखोरपणा, जे प्रचलित आहे त्यालाच एनकॅश करण्याची व्यापारी वृत्ती आणि कमनशीब ... पण आशा दुर्लक्षित राहिली. नाही म्हणायला तिच्या पैलूंवर प्रकाश पाडणारे काही सोनेरी दिवस आहेत ज्यत मेराइन कुछ सामान किंवा आँखोंकी मस्ती के वगैरे लखलखत्या रचना येतात पण कुठेतरी चुटपुट लागून राहतेच की या दैवी आवाजाच्या विविध मनोरम छटा एस् डी, एस् जे, अनिल बिस्वास, सी रामचंद्र यांचयासारख्या जादुगारांच्या संगतीने आभाळाएवढ्या होताना पहायला मिळाल्या असत्यातर कित्ती बहार आली असती....
मी माझ्या परीने आशाच्या एका अतिशय सुरेख गाण्याचा रसास्वाद इथे मांडायचा प्रयत्न करणार आहे. पाहू या किती जमतंय ते....
सांग तू माझा होशील का..
रोज पहाटे स्वप्नी माझ्या येशील का....
कविश्रेष्ठ ग. दि. मा. आणि सुधीर फडके यांच्या अजोड सामर्थ्याला रत्नांचं कोंदण बसवून दिलंय ते आशाच्या आवाजाने.या गाण्यात प्रेमातली हुरहूर, संकोच, सलज्जता, मुग्ध जिव्हाळा, हळवी ओढ, थोडंसं धाडस थोडीशी धाकधूक, मधुर स्वप्नरंजन, तरीही मनातले भाव व्यक्त करताना वाटणारा तो अस्फुट आनंद, पिया मिलनकी आस, क्षणिक विरहानेही होणारी आग हे सगळे भाव एखाद्या झरझर रंग बदलणाऱ्या नवलाईच्या खेळण्यासारखे येतात आणि ऐकणऱ्याला विचार करायचीही फुरसद न देता आपले अनोखे रंग मांडून दुसऱ्याच एखाद्या भावामागे अदृश्यही झालेले असतात. हे गाणं कितीही वेळा ऐका. प्रत्येक वेळेला ते भाव तितकेच तरल, जिवंत आणि हवेहवेसे वाटतात. आवाजाच्या अप्रतिम कोवळेपणाबद्द्ल आणि स्स्तिमित करणाऱ्या मार्दवाबद्दल काय बोलावं? तांत्रिक सफाई आणि अचूकता अगदी एकसंधपणे गाणंभर असते. ती गाणं ऐकत असताना गृहित धरल्यासारखीच वाटते पण ते गाणं प्रत्यक्ष गुणगुणून पाहिलं की तिची खरी किंमत कळते. इतकं अवघड काहीतरी इतक्या सहजतेने करू शकणारा आशाचा तो आवाज दैवी का आहे हे जाणवत राहतं. हे गाणं हीच एक लाखाची गोष्ट आहे....

13 मई 2006

आशा.....

भारतीय त्यातूनही मराठी भावसंगीताच्या दोन देवता आहेत.(इतरही सारे गंधर्व आहेत. त्यांच्या श्रेष्ठत्त्वाबद्दल वाद नाहीत..) पण या दोघींच्या तुलनेचा मोह आवरणं अशक्य असतं. एकाच झाडावरच्या आणि अवीट अशा गुणसुगंधाने दरवळणाऱ्या या दोन फुलांची तुलना कदाचित त्यांच्या बालपणापासूनच होत असावी.
संगीतक्षेत्रात माझा अधिकार एक आस्वादक एवढाच आहे. गानसमुद्रात कानसेन होऊन शिरलेली मी एक तुच्छ माशी आहे. पण तरीही मी आशाबद्दल बोलणार आहे. आशाबाई आणि लतादीदी माझ्या आजीच्या वयाच्या आहेत. तरीही आशाबाईंना मी ती आशा म्हणते कारण त्यांच्या आवाजाला वय नाही आणि आशेच्या सोनेरी परीराणीची डोळ्यासमोर उभी राहणारी छबी आशाच असते.
या दोघीही संगीतक्षेत्रातला एक चमत्कार आहेत. म्हणूनच त्यांची गाणी मी जिवाचा कान करून ऐकते. मिडास राजाने हात लावलेल्या सगळ्याच गोष्टींचं सोनं झालं तसं त्यांचं प्रत्येक गाणं सोनंच असतं. सोन्यात डावं उजवं कसं करणार... तरीही आशाबद्दल मला जे वाटतं ते इथे मांडावंसं वाटतंय..
आशाचा आवाज मला विलक्षण आवडतो. त्या आवाजातली गाणी ऐकताना भावना मूर्त रूप घेऊन येतात. ज्या सहजतेने ती गाताना त्या भावनांशी एकरूप होत असेल त्याच सहजतेने ऐकणाऱ्याचंही मन त्यात विरघळून जातं. प्रत्येक भावना त्याच अचूकतेने येत असते. काळजाला हात घालत असते. भावनांचा मोकळेपणा , प्रामाणिकपणा आणि तरीही तिच्या मधुर आवाजाचं त्यांना लाभलेलं ते दिव्य अस्तर हे ऐकताना मन आशाचा तो दैवी सूर होतं. तिच्या स्वरातून जी भावना कानी पडेल ती भावना मनात उचंबळू लागते. कधी खट्याळ, कधी लाडिक, कधी लटक्या रागाची, कधी अल्लड प्रेमाची, कधी विरहाची, कधी आर्त चिरविरहाची, कधी मादक, कधी प्रेमविव्हल, कधी बालसुलभ मनमोकळेपणाची, कधी आर्जवाची, कधी विनवणीची, कधी लाजलेली, कधी मोहरलेली अशा अनंत निरनिराळ्या भावनांचा एक कॅलिडोस्कोप आहे आशा म्हणजे. जी भावना घ्याल ती आहे तिच्या गीतांमधे. सारळ, थेट, नितळ, एकसंध, ताशीव, ठसठशीत, रेखीव, गुळगुळीत स्वरूपात कमालीच्या नेमकेपणामे येणारं हे आवर्त आहे जे मनभर पसरतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आशाच्या आवाजातला दर्द. लताच्या आवाजात इत्तर भावनांसारखाच दर्दही खुलतो. एखाद्या खिळवून टाकणाऱ्या रत्नस्फटिकाप्रमाणे वाटायला लागतो. मला असं वाटतं की लताच्या आवाजातला दर्द पांघरूण घालतो. त्रयस्थपणे पण अचूक उपचार करणाऱ्या डॉक्टरसारखा तो असतो. त्याने बरं वाटतं पण डॉक्टरच्या स्पर्शाला आईच्या मायेची किनार नसते. आशाच्या आवाजातला दर्द, दुःख मनात ठणकणारं वेदनेचं - दुःखाचं गळू हलक्या हाताने फोडतो. मन स्वच्छ होऊन जातं. मनातलं दुःख साचून रहात नाही. त्यावर पांघरूण घातलं जात नाही तर खोलवर जिव्हाळ्याने भरलेल्या आश्वासक स्पर्शाने ते दुःखच मनाबाहेर केरासारखं लोटून दिलं जातं. आशाच्या आवाजातला दर्द ऐकताना एखाद्या जिवलग मित्राने दुःख वाटून घेतल्यावर जसं हलकं वाटायला लागतं तसं वाटतं. आशाच्या आवाजात आपल्या दुःखाची सहसंवेदना असते.ती पाखर घालते, वेदनांवर फुंकर घालते. आशाचा आवाज आपल्या दुःखाशी एकरूप होतो. आणि काय जादू होते कळत नाही पण दे दुःख एकदम हलकं होऊन जातं.
आशाच्या आवाजाचं सगळं सामान्यातही असामन्य असं असतं. तिथे डोळे दिपत नाहीत. माणूस भव्यतेने दिपून जात असला तरी त्याला भव्य प्रासादापेक्षाही शांत आश्वासक साध्या घरट्यातच सुखाची झोप लागते. नाटकातल्या पात्रांच्या तोंडी शोभून दिसणारे अलंकृत शब्दांचे मोठेमोठे डोलारे आपल्या दुःखाच्या प्रसंगी आपल्या तोंडी नाटकीच वाटतात. आपल्या संकटकाळी आपल्या तोंदी साधेच शब्द असतात ज्यांना त्यातल्या सच्चेपणामुळे सौंदर्य प्राप्त झालेलं असतं. त्या शब्दांच्या उच्चारणामुळे मनातल्या भावनांना वाचा फुटलेली असते. कुठेतरी दाटलेला काळोख रिता झालेला असतो. म्हणून त्या शब्दांनी आतडं तीळ तीळ तुटून जातं. आशाच्या आवाजात नेमकं हेच सगळं सापडतं. तिच्या सुरांनी माझा आनंद द्विगुणित होतो आणि दुःखाचा डोंगर भुईसपाट होतो. म्हणूनच आशा मला आशेच्या परीचं मूर्त रूप वाटते.
आशानाम् हि मनुष्याणां काचिदाश्चर्यशृंखलाम्।
यया बद्धाः प्रधावन्ति मुक्तास्थिष्ठन्ति पंगुवत्॥
म्हणजे काय हे पहायचं असेल तर आशाकडे पहावं!
--अदिती

11 मई 2006

हरि ॐ!

इथल्या दुनियेत मी नवीन आहे आणि तोंड उघडायचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. तेव्हा आत्ताच सगळ्यांना घाबरवणं बरं नाही नाही का! जसं जसं किहीत जाईन तसं तसं कळेलच मी काय काय गोंधळ घालते ते..
मी अदिती. बाकी माहिती लेखनातूनच मिळालेली चांगली. नाही का!
तोपर्यंत शुभमस्तु॥