25 जनवरी 2009

एकवार आज फिरून ....

नव्या वर्षात आजवर दुर्लक्षित असलेल्या ब्लॉगकडे जरा (जास्त) नियमितपणे लक्ष द्यावं असा संकल्प केल्यामुळे आज या पानावर जमलेली धूळ झटकली जाते आहे. सर्व संकल्पांचे रंग हे तेरड्यासारखेच तीन दिवसांत उडून जाणारे असतात. हा किती दिवस टिकतो पहायचं...
हे लिहितालिहिताच बालपणापासून अनेकवेळा जाणवलेलं सत्य नकळत पुन्हा एकदा आठवलं. उत्स्फूर्तता, बेभान-बेधुंद अवस्थेच्या सतत प्रेमात असलेल्या माणसांना सगळ्यात जर कसला कंटाळा येत असेल तर तो असतो नियमितपणा या गोष्टीचा. 'नेमेची येतो मग पावसाळा असे सृष्टीचे कौतुक जाण बाळा ' ही ओळ घातली की निबंधाला कसं वजन येतं, त्यामुळे मार्क मिळवण्यासाठीच्या अनेक युक्त्या-क्लृप्त्यांमधली ही पेटंट युक्ती असली तरीही त्या नियमितपणाचा कंटाळाच प्रत्यक्षात जास्त जाणवलेला आहे. रोजचं आठ-ते-पाच चं चक्र पाळताना ' रुटिनः ज ntu' झालेल्या चाकरमानी पामरांना हे नियमितपणाचं खूळ पाठीवरच्या सिंदबादच्या म्हाताऱ्याइतकं जड वाटल्यास नवल ते काय? तरीसुद्धा आवडतं काम करायला वेळकाळ पहायचा नसतो. म्हणूनच हे जालनिशी - लेखन करायच्या निश्चयाने उसळी मारली आहे.
मराठी जालनिश्यांमध्ये नंदन, ट्युलिप, धोंडोपंत ही माझ्या माहितीतील काही पॉप्युलर नावं. ज्या तन्मयतेने आणि निष्ठेने हे लोक ब्लॉग लिहितात आणि तो सजव्तात ते पाहून तेथे कर माझे जुळती अशीच माझी अवस्था होते. अलिकडे केतन कुल्कर्णींचा असंच-आपलं हा ब्लॉग वाचला. खूप छान वाटलं वाचून. निष्ठेने आणि नियमाने जाललेखन करणाऱ्या या सर्व रथी महारथींना दंडवत घालून 'आयुष्यग्रंथाचं नवं पान उलटते आहे'(सुज्ञांस सांगणे न लगे... )
हे नमनाला बुधलाभर तेल वाया घालवल्यावर आता काहीतरी(च) लिहिणं क्रमप्राप्त आहे म्हणून हा प्रयत्न...

--अदिती

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें